*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने गडचिरोलीत १२.७६ कोटींची गुंतवणूक*
*एटापल्लीत उपजीविका, रोजगार आणि जलसुरक्षेचा तिहेरी फायदा*
गडचिरोली दि. 16 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदिवासी विकास, कृषी क्षेत्र व पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याच्या दूरदृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यासाठी १२.७६ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी ‘समग्र विकास प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समुदायाला उपजीविका, रोजगार आणि जलसुरक्षेचा असा तिहेरी फायदा होणार आहे.
*प्रकल्पाची उद्दिष्टे आणि व्याप्ती*
‘हिंदुस्तान युनिलिव्हर फाऊंडेशन’ (HUF) आणि ‘वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट’ (WOTR) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प मे २०२५ ते मार्च २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीत एटापल्ली तालुक्यातील ३० गावांमधील ३,००० शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार आहे.
हा प्रकल्प आदिवासी समुदायाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावून त्यांना पूर्णपणे स्वयंपूर्ण बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यामध्ये जल टंचाई, शेती, आणि वन-आधारित उपजीविकेच्या समस्यांचे निराकरण केले जाईल.
*तिहेरी फायद्याचे प्रमुख आकडेवारी (३ वर्षांत अपेक्षित):*
* उपजीविकेला बळ (उत्पन्न वाढ):
* या प्रकल्पातून सहभागी शेतकऱ्यांसाठी १५.१२ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न (Additional income) निर्माण होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारण्यास मदत होईल.
* यासोबतच ४,२१२ टन अतिरिक्त कृषी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
* रोजगार निर्मिती:
* प्रकल्पाच्या माध्यमातून गावातच ४,३०,६०० मनुष्य दिवस (Person Days) इतक्या अतिरिक्त रोजगाराची निर्मिती होईल. यामुळे शिक्षित तरुणांचे स्थलांतर थांबेल आणि आदिवासी महिलांना कृषी-व्यवसाय तथा वन-आधारित व्यवसायांमध्ये सक्रिय सहभाग घेता येईल.
* जलसुरक्षा (पाण्याची बचत):
* या प्रकल्पात जलसंधारण आणि जल व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. परिणामी, तीन वर्षांत तब्बल ९.६ अब्ज लिटर (Billion Litres) पाण्याची बचत साधण्याचे महत्त्वाचे लक्ष्य आहे.
*आर्थिक तपशील*
हा ‘होलीस्टिक डेव्हलपमेंट’ प्रकल्प यशस्वी करण्यासाठी एकूण १२ कोटी ७६ लाख सात हजार २५२ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यापैकी हिंदुस्थान युनिलिव्हर फाऊंडेशनचे योगदान ६ कोटी ८६ लाख ७६ हजार १०५ रुपये असून, उर्वरित रक्कम (५,८९,३१,१४७ रुपये) सह-निधीतून जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या पुढाकारामुळे गडचिरोलीतील आदिवासी समुदायाला शाश्वत विकासाच्या दिशेने मोठी गती मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
०००


