*कोया कृषी कुंभातील प्रदर्शन व चर्चासत्रांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा– कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*

*समृद्ध गडचिरोलीसाठी शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान व ‘गडचिरोली ब्रँड’वर भर*
गडचिरोली, (जिमाका), दि.५ : गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध, जंगलव्याप्त व कृषी क्षमतेने परिपूर्ण जिल्हा असून ‘समृद्ध गडचिरोली’ घडविण्यासाठी शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, थेट शेतकरी मदत आणि स्वतंत्र ‘गडचिरोली ब्रँड’ उभारणे आवश्यक आहे. या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या कोया कृषी कुंभ या आधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शन व चर्चासत्रांचा शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
ॲड. आशिष जयस्वाल ‘कोया कृषी कुंभ’ या कृषी प्रदर्शन व चर्चासत्रांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता देवाजी तोफा, सहायक जिल्हाधिकारी एम. अरुण विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कृषी तज्ज्ञ व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
गडचिरोलीला शासनाचे विशेष प्राधान्य
ॲड. जयस्वाल म्हणाले की, गडचिरोलीतील प्रत्येक उत्पादनाला त्याच्या नैसर्गिक शुद्धतेमुळे राज्यात व देशात वेगळे आकर्षण आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाला विशेष प्राधान्य दिले असून, ‘विकसित महाराष्ट्र 2047’च्या दिशेने गडचिरोली महत्त्वाची भूमिका बजावेल.
*शाश्वत शेती व उत्पादन-उत्पन्नाचा समतोल*
फक्त उत्पादन वाढवणे हा शेतीचा उद्देश नसून, मागणी–पुरवठ्याचा समतोल राखत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे. रासायनिक खतांवर अवलंबित्व कमी करून सेंद्रिय, विषमुक्त व पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कृषी विभागाचे नवे व्हिजन ‘शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी’ असेल, असे त्यांनी सांगितले.
*आधुनिक तंत्रज्ञान व चर्चासत्रांचे महत्त्व*
कोया कृषी कुंभामध्ये आधुनिक कृषी यंत्रसामग्री, सुधारित बियाणे, डिजिटल शेती, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, सेंद्रिय शेती पद्धती व मूल्यवर्धन यांचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रांमधून तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळत असून, शासनाच्या कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. या संधीचा शेतकऱ्यांनी पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
*सॅच्युरेशन मोड, थेट लाभ व भांडवली गुंतवणूक*
गडचिरोली जिल्ह्यात कृषी योजनांची संपूर्ण मॅपिंग करून सॅच्युरेशन मोडमध्ये काम केले जाणार आहे. सिंचन सुविधा, विहीर, बोरवेल, पंप, पाईपलाईन, ठिबक व तुषार सिंचन यांचा विस्तार करण्यात येणार आहे. लाभ देण्यासाठी लाॅटरी पद्धत बंद करून ‘पहिले येणाऱ्यास पहिले लाभ याप्रमाणे सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासन कृषी विभागात २५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येत असून, शेतकऱ्याला दीर्घकालीन फायदा होईल अशा मालमत्ता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
*नानाजी देशमुख कृषी संजीवनी व बिरसा मुंडा योजना*
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोलीतील ५६२ गावांचा समावेश असून, ही सर्व गावे समृद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही गडचिरोलीसाठी गेम चेंजर ठरणार असून, यावर्षी शंभर टक्के आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल व सोलर पंप देण्याचे नियोजन आहे. साडेसात हॉर्सपावर कृषी पंपांचे वीज बिल माफ करण्यात आले असून, भविष्यात सौर ऊर्जेकडे वाटचाल केली जाईल.
*‘गडचिरोली’ ब्रँड व विकसित गडचिरोलीचे व्हिजन*
गडचिरोलीतील नैसर्गिक व विषमुक्त उत्पादनांचा ‘गडचिरोली’ ब्रँड तयार करून त्याचे ब्रँडिंग व मार्केटिंग करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती व जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा निधी अधिकाधिक कृषी क्षेत्राकडे वळवून बाजाराभिमुख शेतीला चालना दिली जाईल. आत्मनिर्भर जिल्ह्यातूनच विकसित महाराष्ट्र व विकसित भारत घडेल, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनतेने एकदिशेने काम करून ‘विकसित गडचिरोली’चा रोडमॅप तयार करावा, असे आवाहन ॲड. जयस्वाल यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ. नरोटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान या प्रदर्शनातून जाणून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे अनुदान व मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.
राज्यमंत्री यांनी यावेळी विविध स्टॉलची पाहणी केली. या प्रदर्शनात एसी ट्रॅक्टर पहिल्यांदाच पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



