ताज्या घडामोडी

*तेलघाणी व गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज आमंत्रित*

गडचिरोली दि. १ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी तेलबियांच्या काढणी पश्चात मूल्य साखळी सहाय्याकरिता लक्षांक प्राप्त झाला आहे. इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या घटकांचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत दोन प्रमुख बाबींसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:
१. कापणी पश्चात मूल्य साखळी सहाय्य-तेलबिया (तेलघाणी)
तेलबियांचे संकलन, तेल निष्कर्षण आणि पुनर्प्राप्तीमध्ये कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी कापणी पश्चात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकारकडून विविध घटकांना सहाय्य दिले जाईल.
लक्षांक: जिल्ह्यासाठी १ (एक) तेलघाणी युनिटचा लक्षांक आहे.
क्षमता: १० टन क्षमतेपर्यंत असलेल्या तेल निष्कर्षण युनिटसाठी अर्ज करता येईल.
अनुदान: या घटकासाठी प्रकल्प खर्चाच्या ३३% किंवा कमाल ₹ ९.९० लाख, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे सहाय्य अनुज्ञेय राहील. यात जमीन आणि इमारतीसाठी सहाय्य दिले जाणार नाही, तसेच हे खर्च प्रकल्प खर्चात समाविष्ट केले जाणार नाहीत.
२. गोदाम बांधकाम (२५० मेट्रिक टन क्षमता)
तेलबिया साठवणुकीसाठी २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अनुदान उपलब्ध आहे.
लक्षांक: जिल्ह्यासाठी १ (एक) गोदाम बांधकामाचा लक्षांक प्राप्त झाला आहे.
अनुदान: प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल ₹१२.५० लाख, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे अनुदान अनुज्ञेय राहील.
पात्रता: विस्तृत अंदाजपत्रक बांधकाम विभागाने मंजूर केल्यानंतर तसेच गोदाम बांधकामासाठी कर्ज मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहील.
प्रक्रिया: अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पूर्वसंमती देतील आणि त्यानंतर लाभार्थ्यास बांधकाम सुरु करण्याबाबत कार्यारंभ आदेश देण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया आणि संपर्क
इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या बाबींसाठी आपले अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावेत. या योजनेत प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य तत्त्व लागू असेल.
निवडलेल्या प्रकल्पांना राज्य कृती आराखड्यांमार्फत आर्थिक सहाय्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
या योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या कृषी आणि तेलबिया उद्योगाला बळकटी देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी,यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button