ताज्या घडामोडी

*जिल्ह्याच्या गरजा ओळखून पाच वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*

*२०२६–२७ साठी ३७१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर*

गडचिरोली, दि. १९ : जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे, तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, दुर्गमता, दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा समन्वित मास्टर प्लॅन तयार करावा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या. जिल्ह्याच्या एकूण विकासासाठी किती निधी आवश्यक आहे याचा वास्तववादी अंदाज घेऊन तो पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने विभागावा आणि त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठीची मागणी शासनाकडे सादर करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सन २०२६–२७ साठी जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण) अंतर्गत २९६ कोटी ७८ लाख रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला होता. यासोबतच आकांक्षित जिल्हा म्हणून ७४ कोटी १९ लाख रुपये अतिरिक्त प्रस्तावित करण्यात आल्याने एकूण सुमारे ३७१ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र, विविध अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून एकूण ६६८ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे, त्यामुळे अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास राज्य स्तरीय बैठकीत भक्कम व परिणामकारक कारणमिमांसा स्पष्ट करून जिल्ह्याची बाजू प्रभावीपणे मांडावी, असेही त्यांनी सांगितले.

सन २०२६–२७ साठीचा प्रारूप आराखडा मंजूर करणे तसेच चालू आर्थिक वर्षातील जिल्हा विकास निधीतील खर्चाचा आढावा सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. यावेळी जिल्ह्याचे पालक सचिव तथा वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, आमदार अभिजित वंजारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एम. अरुण, नियोजन उपायुक्त अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

गडचिरोली हा विस्तीर्ण आणि अवघड भौगोलिक रचना असलेला जिल्हा असल्याने विकास निधीची मागणी करताना क्षेत्रफळ, दुर्गमता, दळणवळण सुविधा, मूलभूत सोयी-सुविधा आणि आदिवासी भागांच्या विशेष गरजा लक्षात घेण्याचे निर्देश सहपालकमंत्र्यांनी दिले. मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने समन्वित नियोजन करावे, वन्यप्राणी शेतीकडे येणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच वनक्षेत्रालगतच्या गावांतील नागरिकांना सरपणासाठी जंगलात जाण्याची गरज भासू नये यासाठी प्राधान्याने गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

आरोग्य सेवा अधिक सुदृढ करण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सहकार्याने आरोग्य विभागाने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच ग्रामीण रस्ते उभारणीसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवावेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार नामदेव किरसान तसेच आमदार डॉ. नरोटे, आमदार रामदास मसराम आणि आमदार अभिजित वंजारी यांनी विविध विकासकामांबाबत प्रश्न व सूचना मांडल्या. निधी पुनर्विलोकनाच्या वेळी विधानसभा मतदारसंघनिहाय निधी वितरणावर सविस्तर चर्चा केली जाईल, असे सहपालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात मंजूर झालेला निधी मार्च २०२६ पूर्वी पूर्णपणे खर्ची पडेल, याचे काटेकोर नियोजन सर्व यंत्रणांनी करावे; विहित मुदतीत निधी खर्च न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्याची सविस्तर माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना) सन २०२६–२७ साठी राज्य शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मर्यादेत, अतिरिक्त मागण्यांसह प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक विभागाने आपल्या मागण्या योग्यरीत्या नोंद झाल्याची खात्री करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच सन २०२५–२६ साठी अद्याप प्रशासकीय मान्यता न मिळालेल्या कामांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी आणि ज्या ठिकाणी निधी विहित वेळेत खर्च होणार नाही, तेथे बचतीची माहिती जिल्हा नियोजन समिती कार्यालयास कळवून पुनर्विनियोजनाची प्रक्रिया सुलभ करावी, असेही त्यांनी सूचित केले.

बैठकीच्या शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सहाय्यक नियोजन अधिकारी श्री. हटवार व श्री. पेरगु यांनी बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button