ताज्या घडामोडी

*रास्त भाव दुकानांतून १०० टक्के धान्यवाटप व्हावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश*

गडचिरोली, दि २८ (जिमाका): — जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के धान्यवाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील रास्त भाव दुकानाच्या पाहणीदरम्यान काही दुकानांत धान्य वितरणाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या खाली असल्याचे आढळून आले असून याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी पंडा व जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी नुकतेच येणापूर परिसरात अचानक पाहणी करत दुकानांतील धान्यवितरण नोंदी, वजन यंत्रणा, लाभार्थी यादी व स्टॉक स्थिती तपासली. जिल्हाधिकारी यांनी सूचित केले की, शासनाने निर्धारित केलेले धान्य वेळेवर आणि विनाविलंब पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. वितरण प्रक्रियेत कुठेही विलंब, त्रुटी किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना तातडीने आपापल्या पातळीवर खास पथके नियुक्त करून सर्व दुकाने तपासण्याचे आदेश दिले. धान्यवाटप पात्र लाभार्थ्यांनाच नीटनेटकेपणे होत आहे की नाही, स्टॉकची पडताळणी व ई-पॉस मशीनद्वारे वास्तविक व्यवहार नोंदवले जात आहेत की नाहीत याची विशेषतः शहानिशा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

धान्यवाटपासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी संबंधित पुरवठा यंत्रणेला कळवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button